﻿लूक.
8.
यानंतर येशूंनी एका शहरातून दुसर्‍या शहरात आणि गावोगावी प्रवास करीत परमेश्वराच्या राज्याच्या शुभवार्तेची घोषणा केली. त्यांचे बारा शिष्य त्यांच्याबरोबर होते, 
काही स्त्रियांमधून त्यांनी दुरात्मे काढले, काहींना रोगमुक्त केले होते, मरीया मग्दालिया जिच्यामधून त्यांनी सात भुते काढली होती; 
हेरोदाचा घरगुती कारभारी खुजा, त्याची पत्नी योहान्ना, सुसान्ना व इतर अनेक स्त्रिया, स्वतःच्या मिळकतीतून त्यांना मदत करीत असत. 
लोकांची मोठी गर्दी होत होती आणि वेगवेगळ्या गावांमधून लोक येशूंकडे येत होते, त्यावेळेस त्यांनी हा दाखला सांगितला: 
“एक शेतकरी बी पेरण्याकरिता निघाला. तो बी पेरीत असताना, काही वाटेवर पडले; व तुडविले गेले व आकाशातील पक्ष्यांनी ते खाऊन टाकले. 
काही बी खडकाळ जमिनीवर पडले, ते वर आले, परंतु ओलाव्याच्या अभावी ती रोपे करपून गेली. 
काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले, ते उगवले आणि त्याबरोबर वाढले, पण झुडपांनी त्याची वाढ खुंटविली. 
काही बी सुपीक जमिनीत पडले. ते उगवले आणि जेवढे पेरले होते, त्यापेक्षा शंभरपट पीक आले.” हे सांगून ते म्हणाले, “ज्याला ऐकावयास कान आहेत, त्यांनी ऐकावे.” 
त्यांच्या शिष्यांनी त्यांना विचारले, “या दाखल्याचा अर्थ काय आहे?” 
तेव्हा येशूंनी उत्तर दिले, “परमेश्वराच्या राज्याची रहस्ये जाणून घेण्याचे ज्ञान तुम्हाला दिलेले आहे, परंतु दुसर्‍यांना दाखल्याद्वारेच सांगण्यात येईल,” ते यासाठी की, “ ‘ते पाहत असले तरी त्यांना दिसू नये, ते कानांनी ऐकत असले, तरी त्यांना समजू नये.’ 
“या दाखल्याचा अर्थ असा आहे: बी हे परमेश्वराचे वचन आहे. 
पायवाटेवर पडलेले ते, जे वचन ऐकतात, पण सैतान येतो आणि पेरलेले वचन हृदयातून हिरावून नेतो आणि त्यामुळे त्यांना विश्वास ठेवण्याची व तारणाची संधी मिळत नाही. 
खडकाळ जमिनीसारखे असलेले ते हे, जे वचन आनंदाने स्वीकारतात, पण त्यांना मूळ नसल्यामुळे ते किंचितकाळ विश्वास ठेवतात, परंतु परीक्षा आली म्हणजे ते पडतात. 
काटेरी झाडांमध्ये काही बी पडले, ते असे आहेत की जे ऐकतात, परंतु जीवन जगतांना, जीवनातील काळजी, पैसा, सुखविलास यामुळे त्यांची वाढ खुंटते व ते परिपक्व होत नाहीत; 
काही बी उत्तम जमिनीत पडते, ते प्रामाणिक व चांगल्या अंतःकरणाच्या लोकांचे प्रतीक आहे, जे परमेश्वराचे वचन ऐकतात व धरून राहतात आणि धीराने पीक देतात. 
“कोणी दिवा लावून मातीच्या भांड्याखाली मापाखाली किंवा खाटेखाली ठेवीत नाही! जे आत येणारे आहेत त्यांना दिव्याचा प्रकाश मिळावा म्हणून दिवठणीवर ठेवतात. 
कारण जे प्रकट होणार नाही असे काही लपलेले नाही किंवा जे उघडकीस येणार नाही व कळणार नाही असे काही गुप्त नाही. 
यास्तव तुम्ही कसे ऐकता याविषयी काळजी घ्या. ज्यांच्याजवळ आहे त्यांना अधिक दिले जाईल; ज्यांच्याजवळ नाही, जे त्यांच्याजवळ आहे असे त्यांना वाटते ते देखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल.” 
एकदा येशूंची आई आणि भाऊ त्यांना भेटावयास आले, पण गर्दीमुळे त्यांच्याजवळ त्यांना जाता येईना. 
कोणी त्यांना सांगितले, “तुमची आई आणि तुमचे भाऊ बाहेर थांबले आहेत व आपल्याला भेटू इच्छित आहेत.” 
तेव्हा ते म्हणाले, “जो कोणी परमेश्वराचे वचन ऐकतो व त्यानुसार आचरण करतो, तोच माझा भाऊ व बहीण आणि माझी आई.” 
एके दिवशी येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ.” ते व त्यांचे शिष्य होडीत बसून निघाले. 
ते जात असताना येशू होडीत झोपी गेले आणि सरोवरात भयंकर वादळ आले व होडी बुडू लागली आणि ते मोठ्या संकटात सापडले. 
तेव्हा शिष्यांनी त्यांना उठविले आणि ते त्यांना म्हणाले, “गुरुजी, गुरुजी, आपण सर्वजण बुडत आहोत.” ते उठले आणि त्यांनी वार्‍याला व लाटांना धमकाविले व वादळ थांबले आणि सर्वकाही शांत झाले. 
नंतर येशूंनी शिष्यांना विचारले, “तुमचा विश्वास कुठे आहे?” भीती आणि विस्मयाने ते एकमेकांना म्हणू लागले, “हे कोण आहेत? ते वारा आणि लाटांनाही आज्ञा करतात आणि ते त्यांची आज्ञा पाळतात.” 
मग ते गालील सरोवरातून प्रवास करीत पलीकडे असलेल्या गरसेकरांच्या प्रांतात आले. 
येशू होडीतून किनार्‍यावर उतरले, त्यावेळी त्यांची भेट दुरात्म्याने पछाडलेल्या एक मनुष्याशी झाली. बर्‍याच काळापर्यंत हा मनुष्य बेघर आणि वस्त्रहीन अवस्थेत असून कबरस्तानात राहत होता. 
येशूंना पाहिल्याबरोबर तो त्यांच्या पाया पडून ओरडून म्हणाला, “हे येशू परात्पर परमेश्वराच्या पुत्रा, तुम्हाला माझ्याशी काय काम आहे, मी तुमच्याजवळ विनंती करतो की, कृपा करून मला छळू नका.” 
कारण येशूंनी त्या दुरात्म्याला त्याच्यामधून बाहेर पडण्याची आज्ञा केली होती. तरी पुष्कळदा तो त्याच्यावर प्रबळ होत असे आणि जरी त्याचे हातपाय साखळ्यांनी बांधले आणि पहारा ठेवला, तरी साखळ्या तोडून त्याला एकांत ठिकाणाकडे घेऊन जात असे. 
येशूंनी त्याला विचारले, “तुझे नाव काय आहे?” “माझे नाव लेगियोन आहे,” त्याने उत्तर दिले. कारण त्याच्यामध्ये पुष्कळ दुरात्मे वास करीत होते. 
ते दुरात्मे येशूंना पुन्हा आणि पुन्हा विनंती करू लागले, “आम्हाला अथांग कूपात जाण्याची आज्ञा करू नका.” 
जवळच डोंगराच्या कडेला डुकरांचा एक कळप चरत होता. तेव्हा दुरात्म्यांनी, “आम्हाला डुकरांमध्ये जाऊ द्या,” अशी येशूंना विनंती केली आणि येशूंनी त्यांना तशी परवानगी दिली. 
दुरात्मे त्या मनुष्यातून बाहेर आले आणि डुकरांमध्ये शिरले. त्याक्षणीच तो संपूर्ण कळप डोंगराच्या कडेने धावत सुटला आणि सरोवरात बुडाला. 
डुकरांचे कळप राखणार्‍यांनी काय घडले ते पाहिले आणि त्यांनी धावत जाऊन ही बातमी जवळच्या नगरात आणि ग्रामीण भागात सांगितली. 
तेव्हा खरे काय झाले आहे, हे पाहण्यासाठी लोक तिथे जमले, जेव्हा ते येशूंकडे आले, तेव्हा त्यांनी त्या मनुष्याला पाहिले ज्याच्यामधून भुते निघून गेली होती, तो येशूंच्या चरणाशी बसलेला, कपडे घातलेला आणि भानावर आलेला आहे; हे पाहून ते अतिशय भयभीत झाले. 
प्रत्यक्ष पाहणार्‍यांनी भूतग्रस्त मनुष्याचे काय झाले व तो कसा बरा झाला ते सर्वांना सांगितले. 
तेव्हा गरसेकरांच्या चहूकडील प्रांतातील सर्व लोकांनी, “आमच्या भागातून निघून जावे,” अशी त्यांना विनंती केली कारण ते फार भयभीत झाले होते. तेव्हा येशू होडीत बसून माघारी जाण्यास निघाले. 
ज्या मनुष्यातून दुरात्मे निघाले होते, त्याने येशूंबरोबर जाण्यासाठी विनंती केली, परंतु येशूंनी त्याला असे सांगून पाठवून दिले, 
“आपल्या घरी परत जा आणि परमेश्वराने तुझ्यासाठी जे काही केले आहे ते त्यांना सांग.” तेव्हा तो मनुष्य निघून गेला आणि येशूंनी त्याच्यासाठी किती मोठी गोष्ट केली हे त्याने शहरात सर्व भागात जाऊन सांगितले. 
जेव्हा येशू परतल्यावर, लोकांनी त्यांचे स्वागत केले, कारण ते त्यांची वाटच पाहत होते. 
इतक्यात याईर नावाचा एक सभागृहाचा पुढारी आला, त्याने येशूंच्या पाया पडून त्यांनी आपल्या घरी यावे अशी आग्रहपूर्वक विनंती केली. 
कारण त्याची बारा वर्षाची एकुलती एक मुलगी मरणाच्या पंथाला लागली होती. येशू वाटेवर असताना, लोकांच्या गर्दीने त्यांना जणू काय चेंगरून टाकले. 
आणि तिथे एक स्त्री होती जी बारा वर्षे रक्तस्रावाने आजारी होती, परंतु कोणीही तिला बरे करू शकले नव्हते. 
तिने येशूंच्या पाठीमागे येऊन त्यांच्या झग्याच्या काठाला स्पर्श केला आणि तत्क्षणी तिचा रक्तस्राव थांबला. 
तेव्हा येशूंनी विचारले, “मला कोणी स्पर्श केला?” जेव्हा प्रत्येकाने ते नाकारले, पेत्र म्हणाला, “गुरुजी, लोक तुमच्याभोवती गर्दी करून तुमच्याकडे रेटले जात आहेत.” 
परंतु येशू म्हणाले, “कोणीतरी मला स्पर्श केला आहे. मला माहीत आहे माझ्यामधून शक्ती बाहेर पडली आहे.” 
मग आपण गुप्त राहिलो नाही, असे पाहून ती स्त्री थरथर कापत पुढे आली आणि त्यांच्या पाया पडून, आपण कोणत्या कारणास्तव येशूंना स्पर्श केला व कसे तत्काळ बरे झालो, हे तिने सर्व लोकांसमक्ष सांगितले. 
येशू तिला म्हणाले, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आता शांतीने जा.” 
येशू अजून बोलतच होते तोच सभागृहाचा अधिकारी याईराच्या घराकडून एक सेवक आला आणि म्हणाला, “तुमची कन्या मरण पावली आहे. आता गुरुजींना त्रास देऊ नका.” 
हे ऐकताच येशू याईराला म्हणाले, “भिऊ नकोस, फक्त विश्वास ठेव आणि ती बरी होईल.” 
याईराच्या घरी पोहोचल्यावर, येशूंनी पेत्र, याकोब, योहान आणि त्या मुलीचे आईवडील यांच्याशिवाय इतर कोणालाही आत येऊ दिले नाही. 
ते घर शोक करणार्‍या लोकांनी भरून गेले होते. पण येशू त्यांना म्हणाले, “रडणे थांबवा. ही मुलगी मरण पावली नाही, पण झोपली आहे.” 
तेव्हा ते त्यांना हसू लागले, कारण ती मेली होती, हे त्या सर्वांना माहीत होते. 
मग येशूंनी तिचा हात धरून तिला म्हटले, “माझ्या मुली ऊठ!” 
त्यावेळी तिचा प्राण परत आला आणि ती तत्काळ उठून उभी राहिली. तेव्हा येशू म्हणाले, “तिला काहीतरी खावयास द्या.” 
तिचे आईवडील विस्मित झाले, परंतु येशूंनी त्यांना निक्षून सांगितले, “जे घडले, ते कोणालाही सांगू नका.” 
