﻿मत्तय.
12.
शब्बाथाच्या दिवशी येशू धान्याच्या शेतामधून गेले. त्यांच्या शिष्यांना भूक लागली होती म्हणून ते कणसे तोडून खाऊ लागले. 
जेव्हा परूश्यांनी हे पाहिले, ते त्यांना म्हणाले, “पाहा! तुमचे शिष्य शब्बाथ दिवशी जे नियमशास्त्राविरुद्ध आहे ते करतात.” 
येशूंनी उत्तर दिले, “दावीद आणि त्याच्या सोबत्यांना भूक लागली असता त्यांनी काय केले, हे तुम्ही कधी वाचले नाही काय? 
तो परमेश्वराच्या मंदिरात गेला, त्याने आणि त्याच्या सोबत्यांनी समर्पित भाकरी खाल्या, हे नियमानुसार नव्हते, त्या केवळ याजकांसाठीच होत्या. 
किंवा, मंदिरात सेवा करीत असलेले याजक शब्बाथ दिवशी काम करून शब्बाथ विटाळवितात तरी ते निर्दोष असतात, हे तुम्ही नियमशास्त्रात वाचले नाही काय? 
मी तुम्हाला सांगतो की मंदिरापेक्षा श्रेष्ठ असलेला एकजण येथे आहे. 
‘मला तुमची अर्पणे नकोत पण दया हवी आहे.’ या शास्त्रवचनाचा अर्थ तुम्हाला समजला असता तर जे दोषी नाहीत त्यांच्यावर आरोप लावला नसता. 
कारण मानवपुत्र हा शब्बाथाचाही प्रभू आहे.” 
नंतर ते तिथून निघाले आणि सभागृहामध्ये गेले. 
तिथे हात वाळून गेलेला एक मनुष्य उपस्थित होता. येशूंवर आरोप सिद्ध व्हावे म्हणून त्यांनी विचारले, “शब्बाथ दिवशी बरे करणे नियमानुसार आहे काय?” 
येशूंनी त्यांना उत्तर दिले, “समजा, तुमच्याजवळ एकच मेंढरू आहे आणि शब्बाथ दिवशी ते विहिरीत पडले, तर तुम्ही त्याला धरून वर काढणार नाही काय? 
मग मेंढरापेक्षा मनुष्य कितीतरी पटीने अधिक मोलवान आहे! म्हणून शब्बाथ दिवशी नियमानुसार चांगले करणे योग्य आहे.” 
मग ते त्या मनुष्याला म्हणाले, “तुझा हात लांब कर.” त्याने हात लांब केला आणि तो दुसऱ्या हातासारखा अगदी चांगला झाला. 
परंतु परूश्यांनी जाऊन येशूंना जिवे कसे मारता येईल याची योजना आखली. 
परंतु त्यांचा कट येशूंनी जाणला, व ते मंदिरातून निघून गेले. त्यांच्यामागे एक मोठा जनसमुदाय निघाला, आणि येशूंनी सर्व आजार्‍यांना बरे केले. 
त्यांच्याबद्दल इतरांना सांगू नका, अशी त्यांनी लोकांना सूचनाही दिली. 
या घटनेद्वारे यशायाह संदेष्ट्याने येशूंविषयी केलेली भविष्यवाणी पूर्ण झाली; ती अशी: 
“पाहा, हा माझा सेवक, ज्याला मी निवडलेले आहे, जो मला प्रिय आहे, त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे; माझा आत्मा मी त्याच्या ठायी ठेवेन. राष्ट्रांना तो न्याय जाहीर करेल. 
तो भांडणार नाही किंवा आक्रोश करणार नाही. रस्त्यांमध्ये त्याचा आवाज ऐकू येणार नाही. 
जोपर्यंत तो न्याय विजयास आणणार नाही तोपर्यंत चेपलेला बोरू तो मोडणार नाही, मिणमिणती वात तो विझवणार नाही. 
त्याच्या नावावर सर्व राष्ट्रे आपली आशा ठेवतील.” 
नंतर त्यांनी एका भूतग्रस्त मनुष्याला येशूंकडे आणले, जो आंधळा व मुका होता, आणि येशूंनी त्याला बरे केले, व त्याला बोलता व पाहता येऊ लागले. 
तेव्हा सर्व लोक आश्चर्यचकित होऊन म्हणाले, “हाच दावीदाचा पुत्र असेल काय?” 
परंतु हे ऐकल्यावर परूशी लोक म्हणाले, “हा मनुष्य केवळ बालजबूल, जो भुतांचा राजा सैतान, याच्या साहाय्याने भुते घालवितो.” 
त्यांचे विचार येशूंना माहीत होते, आणि ते त्यांना म्हणाले, “प्रत्येक फूट पडलेल्या राज्याचा नाश होतो किंवा एखाद्या शहरातील किंवा घरातील लोकांत आपसात फूट पडली, तर ते शहर किंवा ते घर टिकू शकत नाही. 
जर सैतानच सैतानाला घालवू लागला आणि त्याच्यात फूट पडली, तर त्याचे राज्य कसे टिकेल? 
आणि जर मी बालजबूलाच्या साहाय्याने भुते काढतो, तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने भुते काढतात? तर मग, ते तुमचे न्यायाधीश असतील. 
परंतु, मी जर परमेश्वराच्या आत्म्याने भुते काढतो, तर परमेश्वराचे राज्य तुमच्यावर आले आहे. 
“किंवा मग, बळकट माणसाच्या घरात प्रवेश करून त्याला आधी बांधल्याशिवाय त्याची मालमत्ता लुटून नेणे कसे शक्य होईल? त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल. 
“जो माझ्याबरोबर नाही तो माझ्याविरुद्ध आहे, आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो विखुरतो. 
आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक प्रकारचे पाप किंवा निंदा यांची क्षमा होऊ शकेल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध केलेल्या निंदेची क्षमा होणार नाही. 
जो कोणी मानवपुत्राच्या विरुद्ध बोलेल त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करेल, त्याला या युगात आणि येणार्‍या युगात कधीही क्षमा होणार नाही. 
“जर झाड चांगले असेल तर त्याचे फळ देखील चांगले असते आणि जर झाड चांगले नसेल तर त्याचे फळ देखील चांगले नसते. झाड त्याच्या फळावरून ओळखले जाते. 
अहो सापांच्या पिलांनो! तुमच्यासारख्या दुष्टांना चांगले आणि यथायोग्य कसे बोलता येईल? कारण अंतःकरणात जे भरलेले आहे तेच मुखातून बाहेर पडते. 
चांगला मनुष्य आपल्यात साठविलेल्या चांगल्या गोष्टी बाहेर काढतो, तर दुष्ट मनुष्य वाईटाने भरलेल्या साठ्यातून वाईटच बाहेर काढतो. 
मी तुम्हाला सांगतो की न्यायाच्या दिवशी प्रत्येकाला त्याच्या प्रत्येक निरर्थक शब्दाबद्दल जाब द्यावा लागणार आहे. 
कारण तुमच्या शब्दांवरूनच तुम्ही निर्दोष ठराल, किंवा तुमच्या शब्दांवरूनच तुम्ही दोषी ठराल.” 
मग परूशी व नियमशास्त्र शिक्षक यांच्यापैकी काही येशूंना म्हणाले, “गुरुजी, तुमच्याकडून आम्हास चिन्ह पाहायचे आहे.” 
येशू त्यांना म्हणाले, “दुष्ट आणि व्यभिचारी पिढी चिन्ह मागते! परंतु योनाह संदेष्ट्याच्या चिन्हाखेरीज दुसरे कोणतेही चिन्ह दिले जाणार नाही. 
कारण ज्याप्रमाणे योनाह मोठ्या माशाच्या पोटात तीन दिवस आणि तीन रात्री राहिला, तसेच मानवपुत्र, भूमीच्या पोटात तीन दिवस आणि तीन रात्री राहील. 
न्यायाच्या दिवशी निनवेहचे लोक उठून या पिढीला दोषी ठरवतील, कारण योनाहचा उपदेश ऐकून त्यांनी पश्चात्ताप केला; आणि पाहा, योनाहपेक्षाही श्रेष्ठ असा एकजण येथे आहे. 
दक्षिणेची राणी न्यायकाळी या पिढीबरोबर उठेल आणि त्यांना दंडपात्र ठरवेल, कारण ती शलोमोनाचे ज्ञान ऐकण्यास पृथ्वीच्या टोकाकडून आली; आणि पाहा, आता तर शलोमोनापेक्षा थोर असा कोणी येथे आहे. 
“एखाद्या मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला, म्हणजे तो रुक्ष ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी जागा शोधतो, आणि ती त्याला सापडत नाही, 
त्यावेळी तो म्हणतो, ‘जे घर मी सोडले, तिथे परत जाईन.’ तो परत आला म्हणजे त्याला ते घर रिकामे, झाडून स्वच्छ केलेले व व्यवस्थित ठेवलेले असे आढळते. 
नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा अधिक दुष्ट असे आणखी सात दुरात्मे आपल्याबरोबर घेऊन येतो व ते आत जाऊन तिथे राहतात, आणि मग त्या मनुष्याची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते. तसेच या दुष्ट पिढीचे होईल.” 
येशू समुहाशी बोलत असताना त्यांची आई आणि भाऊ त्यांच्याशी बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते. 
कोणी त्यांना सांगितले, “तुमची आई आणि तुमचे भाऊ बाहेर उभे आहेत व आपल्याशी बोलू इच्छित आहेत.” 
त्यांनी त्याला उत्तर दिले, “कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ?” 
मग आपल्या शिष्यांकडे बोट दाखवित ते म्हणाले, “हे माझी आई आणि माझे भाऊ आहेत. 
ते पुढे म्हणाले, जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो, तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि माझी आई आहे.” 
