﻿यिर्मयाह.
14.
अनावृष्टि संबंधित खुलासा करणारा संदेश याहवेहकडून यिर्मयाहला प्राप्त झाला. 
“यहूदीया विलाप करीत आहे, तिची नगरे झुरणीला लागली आहेत; ते या भूमीसाठी शोक करीत आहेत, आणि यरुशलेममधून आक्रोश वर जात आहेत. 
त्यातील प्रतिष्ठित लोक विहिरीतून पाणी आणण्यासाठी आपले दास पाठवितात; ते विहिरीवर जातात परंतु त्यांना पाणी मिळत नाही. ते रिकामी घागरी घेऊन परत येतात; गोंधळून व निराश होऊन आपली डोकी झाकून घेतात. 
जमिनीला भेगा पडल्या आहेत कारण भूमीवर पाऊस पडलेला नाही; शेतकरी घाबरले आहेत म्हणून ते आपली डोकी झाकून घेतात. 
हरिणी देखील आपली पाडसे शेतात सोडून जात आहे कारण गवताचा मागमूसही उरला नाही. 
रानगाढवे उजाड टेकड्यांवर उभी राहून कोल्ह्यागत धापा टाकत आहेत; अन्नाशिवाय त्यांची नजर निस्तेज झाली आहे.” 
जरी आमची पापे आमच्याविरुद्ध साक्ष देतात, तरी हे याहवेह, तुमच्या नामाखातर तुम्ही काहीतरी करा. आम्ही तुमच्याविरुद्ध नेहमी बंडखोरी केली आहे; आम्ही तुमच्याविरुद्ध घोर पातक केले आहे! 
तुम्हीच इस्राएलची आशा आहात, संकटसमयीच्या आमच्या त्रात्या, तुम्ही या देशात आमच्याशी परकेपणाने का वागता, केवळ रात्रभर मुक्काम करणार्‍या वाटसरूसारखे का झाला आहात? 
एखाद्या विस्मित झालेल्या व्यक्तीसारखे तुम्ही का आहात? एखाद्या वाचविण्यास अशक्त योद्ध्याप्रमाणे? हे याहवेह, तुम्ही तर येथेच आमच्यामध्ये आहात, आम्ही तुमचे नाव धारण केले आहे; आमचा त्याग करू नका! 
यावर याहवेहने या लोकांबद्दल असे म्हटले: “माझ्यापासून दूर भटकणे त्यांना फार आवडते; ते त्यांची पावले ताब्यात ठेवत नाहीत. म्हणून याहवेह तुमचा स्वीकार करीत नाहीत; आता मी तुमची दुष्कर्मे आठवेन आणि तुमच्या पापांबद्दल तुम्हाला शासन करेन.” 
मग याहवेहने मला म्हटले, “त्यांच्या भल्यासाठी इतःपर प्रार्थना करू नकोस. 
जर ते उपवास करतील, तरी मी त्यांच्या रडण्याकडे मुळीच लक्ष देणार नाही; मला ते होमार्पणे आणि अन्नार्पणे आणतील, मी त्यांचा स्वीकार करणार नाही. याउलट तलवार, दुष्काळ व रोगराई यांनी मी त्यांची परतफेड करेन.” 
परंतु मी म्हटले, “अरेरे, हे सार्वभौम याहवेह! त्यांचे संदेष्टे त्यांना सांगतात, ‘तलवार किंवा दुष्काळ निश्चितच येणार नाहीत. मी या ठिकाणी तुम्हाला खात्रीने स्थायी शांतता देईन.’ ” 
त्यावर याहवेहने मला म्हटले, “संदेष्टे माझ्या नावाने असत्य संदेश सांगत आहेत. मी काही त्यांना पाठविले नाही किंवा त्यांना नेमले नाही वा त्यांच्याशी बोललो नाही. खोट्या दृष्टान्तावरून, प्रकटीकरणांवरून, व्यर्थ शकुनविद्येवरून आणि स्वतःच्या मनाच्या भ्रांतीवरून ते तुम्हाला खोटी भविष्ये सांगतात.” 
म्हणून माझ्या नावाने भविष्यवाणी करणार्‍यांबद्दल याहवेह असे म्हणतात: “मी पाठविले नसतानाही ‘तलवार किंवा दुष्काळ या भूमीला स्पर्श करणार नाही,’ असे बोलणारे हे संदेष्टेच तलवारीला व दुष्काळाला बळी पडतील. 
आणि हे लबाड लोक ज्यांना संदेश देतात तेही तलवारीला व दुष्काळाला बळी पडून यरुशलेमच्या रस्त्यांवर फेकून दिले जातील आणि त्यांना, पत्नी, पुत्र व कन्यांना मूठमाती द्यायलाही कोणी राहणार नाही. कारण मी त्यांच्यावर घोर विपत्ती पाठविणार ज्याला ते पात्र आहेत. 
“हे वचन तू त्यांना सांग: “ ‘रात्रंदिवस माझ्या नेत्रातून अश्रू वाहू दे मी माझे रडणे थांबविणार नाही; माझे लोक, कुमारी कन्या, तिच्यासाठी, कारण ती जखमांनी घायाळ होऊन तुडविली गेली आहे. 
नगराबाहेर जाऊन पाहावे तर, मी तलवारीला बळी पडलेल्यांची प्रेते बघतो; नगरातून गेलो तर उपासमारीला बळी पडलेले दिसतात. संदेष्टे व याजक त्यांना माहीत नसलेल्या देशात गेले आहेत.’ ” 
तुम्ही यहूदीयाचा पूर्णपणे त्याग केला आहे काय? सीयोनाचा तुम्हाला वीट आला आहे काय? तुम्ही आम्हाला अशी वेदना का दिली म्हणजे आम्हाला कधीही आरोग्य मिळणार नाही? आम्ही शांतीची आशा केली होती पण त्यातून काहीही चांगले निष्पन्न झाले नाही, आरोग्य मिळण्याच्या ऐवजी सर्वत्र दहशतच पसरली आहे. 
हे याहवेह, आम्ही आमचा दुष्टपणा पदरी घेतो आणि आमच्या पूर्वजांचा अपराध स्वीकार करतो; आम्ही निश्चितच तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. 
तुमच्या नामासाठी आमचा तिरस्कार करू नका; तुमच्या गौरवी राजासनाची अप्रतिष्ठा करू नका. आमच्यासह केलेल्या कराराची आठवण करा आणि तो मोडू नका. 
या मूर्तिपूजक राष्ट्रातील कोणते व्यर्थ दैवत पाऊस पाडू शकेल का? आकाश स्वतःहून वर्षाव करू शकेल काय? हे याहवेह, आमच्या परमेश्वरा, हे तुमच्याशिवाय कोणीच करणार नाही. म्हणूनच आमची आशा तुमच्यावरच आहे, तुम्हीच हे सर्व करू शकता. 
