﻿उपदेशक.
10.
जशा मेलेल्या माशा सुगंधी तेलाला दुर्गंधी बनवतात, तसेच जराशी मूर्खता सुज्ञान आणि सन्मानावर भारी पडते. 
सुज्ञानाचे अंतःकरण उजवीकडे नेते, म्हणजे त्याला सत्कार्यास प्रवृत्त करते, पण मूर्खाचे अंतःकरण त्याला डावीकडे, म्हणजे दुष्ट कृत्यांकडे ओढून नेते. 
मूर्ख व्यक्ती रस्त्याने चालत असला तरी, त्यांना बुद्धीचा अभाव असतो, आणि सर्वांना दाखवितात की ते किती मूर्ख आहेत. 
जर तुझ्या अधिपतीचा राग तुझ्यावर भडकला, तर आपले स्थान सोडू नकोस; विनम्रता मोठे अपराध शांतविते. 
सूर्याखाली मी एक दुष्टता पाहिली आहे, अशी चूक की जी अधिकार्‍यांकडून घडते. 
मूर्खांना मोठी पदे दिले जातात, आणि श्रीमंतांना खालील स्थान दिले जाते. 
गुलामांना मी घोड्यांवर स्वार झालेले पाहिले आहे, आणि राजपुत्र गुलामाप्रमाणे पायी चालतात. 
जो खड्डा खणतो तोच तिच्यात पडेल. जो कुंपण मोडतो त्याला सर्प चावेल. 
जो खडक खोदतो त्याला त्यापासून दुखापत होते; जो लाकडे फोडतो त्याला त्यापासून धोका होऊ शकेल. 
जर कुर्‍हाड बोथट असली, आणि तिची धार तीक्ष्ण नसेल, तर श्रम अधिक लागते, परंतु निपुणता यश आणेल. 
साप वश होण्यापूर्वी जर गारुड्याला चावला, तर गारुड्याला त्याचा काही उपयोग नाही. 
सुज्ञ व्यक्तीच्या मुखातील शब्द कृपेचे असतात, पण मूर्खाचे ओठ त्याचाच नाश करतात. 
त्यांचे बोलणे प्रथम मूर्खतेचे असते; आणि त्यांच्या बोलण्याचा शेवट दुष्टाईच्या वेडेपणाने होतो; 
मूर्ख शब्द वाढवून बोलतात. पुढे काय घडणार ते कोणी जाणत नाही; त्यांच्यानंतर काय होणार असे एखाद्याला कोणी व्यक्ती सांगू शकणार काय? 
मूर्खांचे श्रम त्यांना थकवून टाकतात; नगराकडे जाणारी वाट त्यांना ठाऊक नसते. 
धिक्कार असो त्या देशाचा ज्याचा राजा एक दास आहे, आणि ज्या देशाचे राजपुत्र सकाळीच मेजवानी सुरू करतात. 
धन्य आहे तो देश ज्याचा राजा उच्चकुळात जन्मलेला आहे आणि ज्या देशाचे राजपुत्र नशेसाठी नव्हे तर शक्तीसाठी योग्य समयी आपले भोजन करतात. 
आळशीपणामुळे घराचे छत पडते; आळशाच्या हातांमुळे घर गळू लागते. 
मनोरंजनासाठी मेजवानी असते, द्राक्षारस जीवनाला आनंदित बनविते, आणि पैशाने सर्व समस्याचे समाधान होते. 
राजाला आपल्या मनात देखील शाप देऊ नको, श्रीमंताला सुद्धा आपल्या शयनकक्षातून शाप देऊ नकोस, कारण आकाशातील एक पक्षी तुझे शब्द घेऊन जाईल, आणि आपल्या पंखाने उडत जाऊन तू काय बोललास याचा अहवाल देईल. 
