﻿नीतिसूत्रे.
9.
सुज्ञानाने आपले घर बांधले आहे; तिने तिचे सात खांब तयार केले आहेत. 
तिने तिच्याकडील मांसाहारी भोजन आणि तिचा द्राक्षारस तयार केला आहे; तिने तिचा मेजसुद्धा सजविलेला आहे. 
तिने तिच्या दासांना बाहेर पाठवले आहे आणि ती नगराच्या सर्वात उच्च स्थानावरून हाक मारते, 
“जे साधे भोळे आहेत, त्या सर्वांनी माझ्या घरी यावे!” जे विवेकशून्य आहेत त्यांना ती म्हणते, 
“इकडे या, माझे भोजन खा आणि मी मिसळलेला द्राक्षारस प्या. 
तुमचे साधेभोळेपण सोडून द्या म्हणजे तुम्ही जगाल; अंतर्ज्ञानाच्या मार्गाने चला.” 
जो टवाळखोराची सुधारणा करतो, तो अपमानास आमंत्रण देतो; जो दुष्टाला धमकावितो त्याला अपशब्द ऐकावे लागतात. 
टवाळखोरांची कान उघाडणी करू नकोस, नाहीतर ते तुझा द्वेष करतील, सुज्ञ माणसांची कान उघाडणी कर आणि ते तुजवर प्रीती करतील. 
सुज्ञ मनुष्याला बोध कर म्हणजे ते अधिक ज्ञानी होतील; नीतिमानाला शिक्षण दे आणि ते त्यांच्या शिक्षणात भर घालतील. 
याहवेहचे भय हा सुज्ञानाचा प्रारंभ होय, आणि पवित्र परमेश्वराचे ज्ञान असणे हा सुज्ञपणा होय. 
कारण सुज्ञतेद्वारे तुझ्या आयुष्याचे दिवस बहुगुणित होतील, आणि तू उदंड आयुष्य जगशील. 
जर तू सुज्ञ असशील, तर तुझे सुज्ञान तुला बक्षीस देईल; जर तू टवाळखोर आहेस, तर तू एकटाच यातना भोगशील. 
मूर्खपणा एक स्वैर स्त्री आहे; ती साधीभोळी आहे आणि तिला काहीच समज नाही. 
ती तिच्या घराच्या दारात बसून राहते, तसेच नगराच्या सर्वात उंच ठिकाणावर ती बसते. 
तिच्याजवळून जाणाऱ्या, जे सरळ त्यांच्या मार्गाने जातात, त्यांना ती बोलाविते, 
“जे साधे भोळे आहेत त्या सर्वांनी माझ्या घरी यावे!” जे विवेकशून्य आहेत त्यांना ती म्हणते, 
“चोरलेले पाणी गोड लागते; गुप्तपणे खाल्लेले अन्न चविष्ट लागते!” 
परंतु त्यांना हे माहीत नसते की तिथे मेलेले लोक आहेत, आणि तिचे पाहुणे आता मृतांच्या खोल जगात आहेत. 
