﻿उत्पत्ती.
19.
त्याच संध्याकाळी ते दोन दूत सदोमास पोहोचले. लोट नगराच्या वेशीत बसला होता. त्यांना पाहिल्याबरोबर त्यांना भेटण्यासाठी तो उठून उभा राहिला आणि आपले डोके भूमीकडे लववून त्याने दंडवत घातले. 
लोट त्यांना म्हणाला, “स्वामींनो, कृपा करून आज रात्री तुम्ही आपल्या सेवकाच्या घरी या. आपण आपले पाय धुवावे आणि रात्री इथे मुक्काम करावा, मग पहाटे तुमच्या पुढील प्रवासास निघा.” ते म्हणाले, “नको, आम्ही चौकातच रात्र घालवू.” 
पण लोटाने फारच आग्रह केल्यामुळे ते त्याच्याबरोबर त्याच्या घरात गेले. त्याने त्यांच्यासाठी बेखमीर भाकरीचे भोजन तयार केले, आणि ते जेवले. 
ते झोपण्याच्या आधी, सदोम शहराच्या प्रत्येक भागातील सर्व पुरुषांनी—तरुणांपासून वृद्धांपर्यंत—लोटाच्या घराला वेढा घातला. 
लोटाला ते ओरडून म्हणाले, “जे पुरुष तुझ्याकडे आज रात्री आले ते कुठे आहेत? त्यांना आमच्याकडे बाहेर आण म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करू.” 
लोट त्यांच्याबरोबर बोलण्यास बाहेर गेला आणि आपल्यामागे दार लावून घेतले. 
“आणि म्हणाला, नाही माझ्या मित्रांनो, असे भयंकर दुष्कर्म करू नका. 
पाहा, मला दोन कन्या आहेत ज्या अजून कुमारिका आहेत. त्यांना मी तुमच्या स्वाधीन करतो; त्यांच्याशी तुम्हाला पाहिजे तसे वागा, पण या दोन माणसांच्या वाटेला जाऊ नका, कारण ते माझ्या आश्रयाला आले आहेत.” 
“आमच्या मार्गातून दूर जा,” ते म्हणाले. “हा मनुष्य इथे परदेशी म्हणून आला होता आणि आता त्याला न्यायाधीशाची भूमिका करावयाची आहे! आम्ही तुम्हाला त्याच्यापेक्षा वाईट वागवू.” ते लोटावर दबाव टाकत राहिले आणि दार तोडण्यासाठी पुढे गेले. 
पण आतील त्या पुरुषांनी लोटाला घरात ओढून घेतले आणि दार बंद केले. 
मग तरुण आणि वृद्ध पुरुष जे घराच्या दरवाजात होते, त्यांना त्यांनी अंधत्वाचा असा फटका दिला की त्यांना दरवाजा सापडेना. 
ते दोन पुरुष लोटाला म्हणाले, “या ठिकाणी तुझे जावई, मुले किंवा मुली किंवा अजून कोणी या शहरात जे तुझे आपले असे आहे काय? त्यांना येथून बाहेर काढ, 
कारण आम्ही या शहराचा नाश करणार आहोत. याहवेहपर्यंत या लोकांविरुद्ध आलेला आक्रोश इतका मोठा आहे की त्यांनी आम्हाला त्याचा नाश करण्यासाठी पाठविले आहे.” 
तेव्हा लोट आपल्या जावयांकडे गेला, जे त्याच्या मुलींशी विवाह करण्यास वचनबद्ध होते. तो म्हणाला, “घाई करा आणि या ठिकाणातून बाहेर चला, कारण याहवेह या शहराचा नाश करणार आहेत!” पण त्याच्या जावयांना वाटले की, तो विनोद करीत आहे. 
पहाट होताच, दूत लोटाला आग्रह करीत म्हणाले, “त्वरा कर! तुझी पत्नी व तुझ्या दोन कन्या ज्या इथे आहेत त्यांना घेऊन नीघ, नाहीतर या नगराचा नाश होत असताना तुझाही नाश होईल.” 
पण लोट आढेवेढे घेऊ लागला, तेव्हा दूतांनी त्याचा, त्याच्या पत्नीचा आणि त्याच्या दोन्ही कन्यांचे हात धरून त्यांना नगराबाहेर एका सुरक्षित ठिकाणी आणून सोडले, कारण त्या कुटुंबावर याहवेहची कृपा होती. 
दूतांनी त्यांना ताकीद दिली, “आता जीव घेऊन पळा! पाठीमागे अजिबात वळून पाहू नका, सपाट भूमीवर रेंगाळत राहू नका! थेट डोंगरावर जा, नाहीतर तुम्हीही त्याच्या आवाक्यात याल!” 
यावर लोट विनवणी करीत म्हणाला, “स्वामींनो, कृपा करून असे करू नका! 
तुम्ही तुमच्या सेवकाशी इतके दयाळूपणाने वागला आहात व तुम्ही माझा जीव वाचविला आहे. परंतु मला डोंगरावर पाठवू नका; तिथे कदाचित माझ्यावर काही अरिष्ट येईल आणि मी मरेन. 
पाहा, तिथे जवळच एक गाव आहे आणि ते लहानही आहे. तिथे पळून जाण्याची परवानगी द्या—हे अगदी लहानसे आहे, नाही का? म्हणजे माझा जीव वाचेल.” 
तो त्याला म्हणाला, “ठीक आहे, मी तुझी विनंती मान्य करतो; तू म्हणतोस त्या गावाचा मी नाश करणार नाही. 
पण त्वरा कर आणि तिथे जा, कारण तू तिथे पोहोचेपर्यंत मला काहीच हालचाल करता येत नाही.” (त्या वेळेपासून त्या गावाचे नाव सोअर नगरी असे पडले.) 
सूर्योदयाच्या सुमारास लोट सोअर गावात जाऊन पोहोचला. 
मग याहवेहने सदोम आणि गमोरा या नगरांवर स्वर्गातून—याहवेहकडूनच—ज्वलंत गंधकाचा वर्षाव केला; 
आणि त्या दोन नगरांबरोबर आसपासची इतर गावे, तसेच सर्व वनस्पतीचा संपूर्ण नाश केला. 
परंतु लोटाच्या पत्नीने मागे वळून पाहिले, ती मिठाचा खांब झाली. 
दुसर्‍या दिवशी अब्राहाम पहाटेच उठला आणि ज्या ठिकाणी तो याहवेहसमोर उभा राहिला होता त्या ठिकाणी आला. 
त्याने मैदानापलीकडे असलेल्या सदोम आणि गमोरा याकडे नजर टाकली, भट्टीतून निघाल्यासारखे धुरांचे लोटच्या लोट त्या नगरातून उसळून वर येत आहेत, असे त्याला दिसले. 
मग जेव्हा परमेश्वराने त्या नगरांचा नाश केला, त्यांना अब्राहामाची आठवण आली आणि त्यांनी ज्या नगरास मृत्यूने विळखा घातला होता त्या लोट राहात असलेल्या नगरातून त्याला सोडविले. 
पुढे लोटाने सोअरमधील लोकांच्या भीतीमुळे ते गाव सोडले व तो आपल्या दोन मुलींना घेऊन डोंगरातील एक गुहेमध्ये जाऊन राहिला. 
एके दिवशी थोरली मुलगी धाकट्या बहिणीला म्हणाली, “आपले वडील म्हातारे झाले आहेत आणि आजूबाजूला एकही पुरुष नाही की जो आपल्याला मूल देईल—जशी पृथ्वीवरील प्रथा आहे. 
तेव्हा चल, आपण त्यांना खूप द्राक्षमद्य पाजू आणि मग त्यांच्याबरोबर शय्या करू म्हणजे आपला वंश आपल्या वडिलांद्वारे कायम राहील.” 
त्या रात्री त्यांनी लोटाला भरपूर मद्य पाजले. मग थोरली आत गेली आणि तिने आपल्या वडिलांबरोबर शय्या केली; ती केव्हा निजली व केव्हा उठली याचे त्याला भानच नव्हते! 
दुसर्‍या दिवशी सकाळी थोरली मुलगी आपल्या धाकट्या बहिणीस म्हणाली, “काल रात्री मी आपल्या वडिलांबरोबर शय्या केली, आज रात्रीही आपण त्यांना भरपूर मद्य पाजू आणि मग तू त्यांच्याशी शय्या कर म्हणजे अशा रीतीने आपला वंश आपल्या वडिलांद्वारे पुढे चालेल.” 
त्याप्रमाणे त्या रात्री त्यांनी आपल्या वडिलांना पुन्हा भरपूर मद्य पाजले. मग धाकटी मुलगी आत गेली आणि त्याच्यासोबत शय्या केली. ती केव्हा निजली व केव्हा उठली याचे त्याला भानच नव्हते! 
अशा रीतीने लोटाच्या दोन्ही मुली आपल्या वडिलांपासून गर्भवती झाल्या. 
थोरल्या मुलीला पुत्र झाला, तिने त्याचे नाव मोआब असे ठेवले व तो मोआबी राष्ट्राचा मूळ पुरुष झाला. 
धाकट्या मुलीलासुद्धा पुत्र झाला आणि तिने त्याचे नाव बेनअम्मी असे ठेवले, तो अम्मोनी राष्ट्राचा मूळ पुरुष झाला. 
