﻿गल.
5.
या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मोकळे केले आहे म्हणून त्यामध्ये तुम्ही टिकून राहा आणि दासपणाच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. 
पाहा, मी पौल तुम्हास हे सांगतो की, तुम्ही जर सुंता करून घेतली तर तुम्हास ख्रिस्ताचा उपयोग नाही. 
कारण सुंता झालेल्या प्रत्येक मनुष्यास मी हे पुन्हा निक्षून सांगतो की, तो संपूर्ण नियमशास्त्र पाळण्यास बांधलेला आहे. 
नियमशास्त्राने नीतिमान ठरण्याची इच्छा धरता ते तुम्ही ख्रिस्ताला अंतरला आहा; तुम्ही कृपेला अंतरला आहा, 
कारण आपण देवाच्या आत्म्याच्याद्वारे, विश्वासाने, नीतिमत्त्वाची आशा धरून वाट पाहत आहोत. 
ख्रिस्त येशूमध्ये सुंता काही कामाची नाही आणि सुंता न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही; तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे. 
तुम्ही चांगले धावत होता; तुम्ही खरेपणाला मान्य होऊ नये म्हणून तुम्हास कोणी अडथळा केला? 
तुम्हास जो बोलवत आहे त्या परमेश्वराची ही शिकवण नाही, 
‘थोडेसे खमीर सगळा कणकेचा गोळा फुगवते.’ 
मला तुमच्याविषयी प्रभूमध्ये खातरी आहे की, तुम्ही दुसरा विचार करणार नाही पण तुम्हास घोटाळ्यात पाडणारा मग तो कोणी का असेना तो दंड भोगील. 
आणि बंधूंनो, मी जर अजून सुंतेचा उपदेश करीत असलो, तर अजून माझा छळ का होत आहे? मग तसे असते तर वधस्तंभाचे अडखळण नाहीसे झाले आहे. 
तुमच्या ठायी अस्थिरता उत्पन्न करणारे स्वतःला छेदून घेतील तर बरे होईल. 
कारण बंधूंनो, तुम्हास स्वातंत्र्यतेकरिता बोलावले गेले आहे. तरी त्या स्वतंत्रतेने देह वासनांना संधी देऊ नका. पण प्रीतीने एकमेकांची सेवा करा. 
कारण, ‘जशी आपणावर तशीच आपल्या शेजार्‍यावर प्रीती करा.’ हे एकच वचन पाळल्याने सर्व नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. 
पण तुम्ही जर एकमेकांना चावता आणि खाऊन टाकता, तर तुम्ही एकमेकांचा नाश करू नये म्हणून जपा. 
म्हणून मी म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहाची वासना पूर्ण करणारच नाही. 
कारण देहवासना देवाच्या आत्म्याविरुद्ध आहे आणि आत्मा देहवासनेविरुद्ध आहे; हे परस्परांस विरूद्ध आहेत, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुम्ही करू नये. 
तुम्ही देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. 
आता देहाची कामे उघड आहेत आणि ती हीः व्यभिचार, अमंगळपणा, कामातुरपणा, 
मूर्तीपूजा, जादूटोणा, वैर, कलह, ईर्ष्या, राग, विरोध, फुटी, गट, 
मत्सर, धुंदी, दंगल आणि ह्यांसारखी आणखी; ह्यांविषयी मी जसे पूर्वी सांगितले होते तसे आता आधी सांगतो की, या गोष्टी करणार्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. 
पवित्र आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळही आहेत प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, 
सौम्यता, इंद्रियदमन हे आहे; अशांविरूद्ध नियमशास्त्र नाही. 
जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देहाच्या भावना व वासनांसहित देहस्वभावाला वधस्तंभावर खिळले आहे. 
आपण जर देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे. 
आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकाला चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे असे होऊ नये. 
