﻿नीति.
30.
याकेचा मुलगा आगूर याची वचने म्हणजे देववाणी आहेत. त्या पुरुषाने इथीएलाला, इथीएलाने उकालाला सांगितले, 
खचित मी खूप क्रूर आहे मनुष्य नाही; मला मानवजातीप्रमाणे समजदार बुद्धी नाही. 
मी ज्ञान शिकलो नाही, आणि जो पवित्र त्याचे ज्ञान मला नाही. 
आकाशापर्यंत चढून कोण गेला आहे आणि खाली उतरला आहे? कोणी वाऱ्याला आपल्या ओंजळीत एकवटून घेतला आहे? कोणी आपल्या कपड्यात जलाशय बांधून ठेवला आहे? पृथ्वीच्या सर्व सीमा कोणी स्थापिल्या आहेत? त्याचे नाव काय किंवा त्याच्या मुलाचे नाव काय? खात्रीने ते तुला माहित आहे काय? 
देवाचा प्रत्येक शब्द पारखलेला आहे, जे त्याच्या आश्रयास येतात त्यांची तो ढाल आहे. 
त्याच्या वचनात काही भर घालू नको, घालशील तर तो तुझा दोष उघड करील आणि तू लबाड ठरशील. 
मी तुझ्याजवळ दोन गोष्टी मागतो, मी मरण्यापूर्वी त्या मला देण्याचे नाकारू नको. 
पोकळ गर्व आणि लबाड्या माझ्यापासून दूर कर; मला खूप श्रीमंत किंवा खूप गरीब करू नकोस. मला आवश्यक तेवढेच अन्न दे. 
माझी जर अतीतृप्ती झाली तर मी तुला नाकारीन आणि परमेश्वर कोण आहे? असे म्हणेन; मी जर दरिद्री राहिलो तर मी कदाचित् चोरी करेन. आणि माझ्या देवाच्या नामाची निंदा करेन. 
सेवकाची निंदानालस्ती त्याच्या धन्याजवळ करू नको, करशील तर तो तुला शिव्याशाप देईल आणि तू अपराधी ठरशील. 
आपल्या पित्याला शाप देणारा, आणि आपल्या आईला आशीर्वाद देत नाही अशी एक पिढी आहे, 
त्यांच्या दृष्टीने आपणाला शुद्ध समजणारी, पण त्यांनी स्वतःची घाण धुतलेली नाही अशी एक पिढी आहे. 
ज्यांचे डोळे कितीतरी गर्विष्ठ आहेत, आणि ज्यांच्या पापण्या वर चढलेल्या आहेत अशी एक पिढी आहे. 
गरीबांना पृथ्वीतून व गरजवंताना मनुष्यामधून खाऊन टाकायला, जिचे दात तलवारीसारखे व जिच्या दाढा सुऱ्यांसारख्या आहेत अशी एक पिढी आहे. 
जळवेच्या दोन मुली आहेत, त्या दे, व दे अशा ओरडतात. तीन गोष्टी कधीही समाधानी नसतात, चार गोष्टी, कधीही पुरे म्हणत नाही. 
मृत्यूची जागा, वांझ उदर, पाण्याने तहानलेली पृथ्वी आणि जो अग्नी पुरे कधी म्हणत नाही. 
जो डोळा पित्याची चेष्टा करतो, किंवा त्याच्या आईची आज्ञा पाळणे तुच्छ मानतो, त्यांचे डोळे खोऱ्यातले डोमकावळे टोचून बाहेर काढतील आणि त्यास गिधडाची पिल्ले खाऊन टाकतील. 
मला तीन गोष्टी फार आश्चर्याच्या वाटतात, चार गोष्टी, ज्या मी समजू शकत नाही. 
आकाशात उडणाऱ्या गरुडाचा मार्ग; दगडावर चालणाऱ्या सापाचा मार्ग, समुद्राच्या हृदयात जाणाऱ्या जहाजाचा मार्ग, आणि तरुण स्त्रीबरोबर पुरुषाच्या संबंधाचा मार्ग, 
हा व्यभिचारी स्त्रिचा मार्ग असा आहे; ती खाऊन तोंड पुसते, आणि म्हणते मी काही चुकीचे केले नाही. 
तीन गोष्टीने पृथ्वी कांपते, आणि चार गोष्टी तिला सहन होत नाहीत. 
जेव्हा दास राजा होतो, अन्नाने तुडुंब पोट भरलेला मूर्ख; 
विवाह झालेली त्रासदायक स्त्री; मालकिणीची वारस झालेली दासी. 
पृथ्वीवरच्या चार गोष्टी अगदी लहान आहेत; पण त्या अतिशय शहाणपणाच्या आहेत. 
मुंग्या अगदी लहान आणि दुर्बल असतात, पण तरीही त्या उन्हाळ्यात आपले अन्न साठवतात. 
ससे हे सशक्त प्राणी नाहीत, पण ते खडकात आपले घर करतात. 
टोळांना राजा नसतो, पण तरीही ते सर्व टोळीटोळीने बाहेर जातात. 
पाल आपण हातानी पकडू शकतो, तरी ती राजाच्या महालात सापडते. 
जे आपल्या चालण्यात डौलदार असतात असे तीन प्राणी आहेत, चौघांची आपली चालण्याची ढब सुरेख आहे, 
सिंह सर्व प्राण्यात सगळ्यात बलवान आहे तो कोणापासूनही मागे फिरत नाही. 
गर्वाने चालणारा कोंबडा, बोकड; आणि ज्याचे सैन्य त्याच्याजवळ आहे असा राजा. 
जर तू गर्वाने ताठ होण्याचे मूर्खत्व केले किंवा दुष्टता योजिली तर आपला हात आपल्या मुखावर ठेव. 
कारण जसे दूध घुसळण्याने लोणी निघते, आणि नाक पिळण्याने रक्त निघते, तसे राग चेतवल्याने भांडणे निर्माण होतात. 
