﻿ईयो.
27.
नंतर ईयोब ने आपले बोलणे पुढे चालू ठेवले आणि म्हणाला, 
“जसे देव जिवंत आहे, तो माझ्याबाबतीत अन्यायी होता, त्या सर्वशक्तिमान देवाने माझ्या जीवाला दु:ख दिले आहे, 
जोपर्यंत माझ्यात जीव आहे आणि देवाचा जिवंत श्वास माझ्या नाकात आहे तोपर्यंत, 
माझे ओठ वाईट गोष्टी बोलणार नाहीत आणि माझी जीभ खोटे सांगणार नाही. 
तुम्ही बरोबर आहात हेही मी कधी मान्य करणार नाही. मी निरपराध आहे हेच मी मरेपर्यंत सांगत राहीन. 
मी ज्या चांगल्या गोष्टी केल्या त्यांना मी चिकटून राहीन. चांगले वागणे मी कधीही सोडणार नाही. मरेपर्यंत माझे मन मला कधीही खाणार नाही. 
माझे शत्रू दुष्टासारखे होवो, अनितीमान मनुष्यासारखे ते माझ्यावर उठो. 
कारण देवविरहीत राहणाऱ्यांना देव जीवनातून छेदतो तर त्यांची काय आशा आहे, त्याचा जीव त्याने काढून घेतला म्हणजे त्यास काय आशा आहे? 
देव त्याची आरोळी ऐकेल काय? जेव्हा त्याच्यावर संकटे येतील, 
तो सर्वशक्तिमानाच्या ठायी आनंद मानेल काय? आणि तो देवाला सर्वदा हाक मारेल काय? 
मी तुम्हास देवाच्या हाताविषयी शिकविल, सर्वशक्तिमानाच्या योजना मी तुमच्यापासून लपवणार नाही. 
पाहा, तुम्ही सर्वांनी हे पाहिले आहे, मग तुम्ही असे निरर्थक का बोलता? 
देवाने वाईट लोकांसाठी हीच योजना आखली होती. आणि सर्वशक्तिमानाकडून जुलम्यास हेच वतन मिळते. 
त्यास खूप मुले असतील परंतु त्याची मुले तलवारीने मरतील, दुष्ट मनुष्याच्या मुलांना पुरेसे खायला मिळणार नाही. 
राहीलेली सर्व मुले साथीने मरतील, आणि त्यांच्या विधवा विलाप करणार नाहीत. 
दुष्ट मनुष्यास इतकी चांदी मिळेल की ती त्यास मातीमोल वाटेल, त्यास इतके कपडे मिळतील की ते त्यास मातीच्या ढिगाप्रमाणे वाटतील. 
जरी तो कपडे करील ते धार्मिक अंगावर घालतील, निर्दोष त्याची चांदी त्यांच्यामध्ये वाटून घेतील. 
तो त्याचे घर कोळ्यासारखे बांधतो, रखवालदाराने बांधलेल्या झोपडीसारखे ते असते. 
तो श्रीमंत स्थितीत अंग टाकतो, परंतू सर्वदा असे राहणार नाही, तो उघडून बघेल तेव्हा सर्व गेलेले असेल. 
भय त्यास पाण्याप्रमाणे घेवून जाईल, वादळ त्यास रात्री घेवून जाईल. 
पूर्वेचा वारा त्यास वाहून नेईल आणि तो जाईल वादळ त्यास त्याच्या घरातून उडवून लावेल. 
तो वारा त्यास फेकून देईल आणि थांबणार नाही, तो त्याच्या हातातून निसटून जाण्याचा प्रयत्न करील. 
तेव्हा लोक टाळ्या वाजवतील आणि त्याची थट्टा करतील, त्याच्या ठिकाणातून त्यास पळवून लावतील.” 
